Breaking News

सख्खा भाऊ पक्का वैरी, शेळीच्या पैशावरुन वाद, थेट ३०७!

 सख्खा भाऊ पक्का वैरी, शेळीच्या पैशावरुन वाद, थेट ३०७!


(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) अहमदनगर : शेळी विकून मिळालेल्या पैशाच्या वाटणीवरुन वाद झाल्याने मोठ्या भावाने सख्या लहान भावाची धारदार शस्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

राहाता तालुक्यातील शिंगवे या गावामध्ये राहणारे मोरे कुटुंबियांचा शेळी- बकरी पालनाचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे तीस ते पस्तीस शेळ्या बकऱ्या आहेत. मात्र आई वडिलांनी पाळलेल्या बकऱ्यांवरून मयत जालिंदर मोरे आणि त्याचा मोठा भाऊ महेंद्र मोरे यांच्यात यांच्यात नेहमी शाब्दिक खटके उडत होते. दोघांनाही दारुचे व्यसन असल्याने त्यांच्यात कधी कधी टोकाचे वाद व्हायचे.

नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी दोघांचीही समजूत काढली मात्र त्यांचे वाद काही थांबत नव्हते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार दोघेही वारंवार आई वडिलांकडे पैशाची मागणी करत तसेच कधी कधी त्यांना मारहाण देखील करत होते.

दोघा भावांनी नुकतीच आई वडिलांनी पाळलेल्या बकऱ्यांपैकी एक बकरी चोरुन तीची विक्री केली. मात्र मिळालेल्या पैशाच्या वाटणवरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. दुपारच्या सुमारास दोघेही दारुच्या नशेत असताना गावातील लक्ष्मी आईच्या मंदिरासमोर एकमेकांच्या समोर आले. पुन्हा पैशाच्या वाटणीवरून दोघात भांडण झाले. यावेळी मोठा भाऊ महेंद्र मोरे याने आपला सख्खा लहान भाऊ जालिंदर मोरे यांच्या मानेवर कुऱ्हाडी सारख्या धारदार शस्राने वार केल्याने जालिंदर हा गतप्राण झाला.

घटनेची माहिती मिळताच राहाता पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक झिने, पोलीस नाईक नरोडे, पोलीस नाईक माळी, पोलीस नाईक व्यवारे, पोलीस नाईक पंडोरे, चालक अनारसे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी प्रवरा हॉस्पिटल लोणी येथे पाठवण्यात आला. दरम्यान शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

आरोपी आणि मयताचा चुलत भाऊ राजेंद्र मोरे यांच्या फिर्यादीवरुन राहाता पोलीस ठाण्यात आरोपी महेंद्र मोरे याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मात्र किरकोळ पैशाच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केल्याने अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत