Breaking News

बेला येथे माकडांचा धुमाकूळ, नागरीक वैतागले,

 धुमाकूळ घालणाऱ्या माकडांना पकडण्यात वनविभागाला यश

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, बेला : बेला गावामध्ये अनेक वर्षापासून माकडांचा धुमाकूळ सुरू आहे. या माकडांनी अनेकदा नागरिकांना चावे घेतले आहेत. या छोट्या मुलांचा समावेश अधिक आहे. या माकडांचा त्रास केवळ गेला येथेच नाही तर आजूबाजूच्या अनेक गावात असून त्यांच्या त्रासामुळे नागरिक बेजार झाले आहेत. गावातील महिला वर्ग घराच्या छतावर, गच्चीवर धान्य किंवा तत्सम पदार्थ वाळू घालतात तर या माकडांचा कळप तिथे येऊन संपूर्ण धान्य फस्त करतात. 

हेही वाचा : ..त्या नरभक्षक वाघाला सात तासांच्या रेस्कुनंतर केले जेरबंद

दोन दिवसापूर्वी येथील युवक मयूर अरुण बावणे यांच्या अंगणातील आंब्याच्या झाडावर माकडे आली होती ती हाकलायला गेले असता माकडे त्याचा अंगावर आली. गच्चीवरून तो खाली पडला गंभीररित्या जखमी होऊन अति दक्षता विभागात त्याला हळविण्यात आले . काही दिवसापूर्वी सुभद्रा तीमांडे या महिलेला सुद्धा गंभीर जखमी केले तर काही वर्षापूर्वी प्रीतम पटले या शिक्षकांचा माकडाने बळी घेतला. पाणबुडे व मेंदूले या महिलांना सुद्धा माकडाने जखमी केले होते . त्यांना उपचारासाठी प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना नागपूरच्या मेडिकल इस्पितळात भरती करण्यात आले होते. यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

हेही वाचा : ताडोबात वाघाचा मृतदेह आढळला; अधिवास क्षेत्रावरून झुंज की..

या सर्व बाबी लक्षात घेता बेला सर्कलच्या जि.प. सदस्या वंदनाताई बालपांडे यांनी बुटीबोरी परिक्षेत्र अधिकारी श्री. वाडे यांना निवेदन देऊन तसेच बेला सरपंच अरुण बालपांडे व उपसरपंच प्रशांत लांबट वनपरिक्षेत्र अधिकारी अधिकारी बुटीबोरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या गंभीर बाबीवर चर्चा करून या माकडांचा बंदोबस्त करण्याची विनंती केली.

या प्रकाराची गंभीरतेने दखल घेत वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी शनिवार २५ फेब्रुवारी रोजी आमघाट येथील राऊंड अधिकारी जनवार तसेच वनरक्षक सुधीर कुल्लरकर,दिनेश पडवाल,वनमजूर बंडु कुमरे, दिनेश मसराम यांना आवश्यक सूचना देऊन माकड पकडण्याचे (मंकी केज) उपलब्ध करून दिले. या कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नाने दोन माकडांना जेरबंद करण्यात यश आले. या माकडांना बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी उसळली होती. 

जर पिंजऱ्याची संख्या अधिक वाढवली असती तर अधिक माकडे जेरबंद करण्यात यश मिळाले असते, असे सरपंच अरुण बालपांडे यांनी सांगितले.यांच्या संकल्पनेतून अधिक पिंजरे तयार करण्यात येणार असून त्याद्वारे अधिकाधिक माकड पकडण्यात मदत होईल. या उपक्रमाला बेला येथील एकता ग्रुप, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळत आहे.

संपादन : दिनेश गोळघाटे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत