Breaking News

बीएसएनएल टॉवरचं काम तेलंगणाच्या वनकर्मचाऱ्यांनी केले बंद

गाव महाराष्ट्राचं – दादागिरी तेलंगणाची! बीएसएनएल टॉवरचं काम तेलंगणाच्या वनकर्मचाऱ्यांनी केले बंद

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी,शेख हक्कानी,चंद्रपूर : जिवती तालुक्यातील पळसगुडा गावात महाराष्ट्र सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या बीएसएनएल टॉवरच्या कामावर अक्षरशः गंडांतर आलं आहे. महाराष्ट्राची महसुली हद्द असलेल्या या गावात काम सुरु असताना तेलंगणा वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी धडकले आणि “ये बॉर्डर हमारे तेलंगणा की है, काम बंद करो नाही तर कारवाई होगी” अशी भाषा वापरत सरळ बांधकामच बंद करून टाकले.

शेतकऱ्याने दिलेली जागा – पण काम बंद

या टॉवरसाठी श्री अर्जुन गंगाराम भालेराव (सर्वे नं. 242) या शेतकऱ्याने स्वतःच्या सातबाऱ्यातील जमिनीचा काही भाग दान स्वरूपात दिला होता. रेती, सिमेंट, रॉडसह सर्व साहित्य आणून खोदकाम सुरूही झाले होते. मात्र अचानक आलेल्या तेलंगणाच्या अधिकाऱ्यांनी “ही जागा तेलंगणाची” असल्याचे सांगत बांधकाम थांबवले.

गावकऱ्यांचा रोष उसळला

महाराष्ट्र प्रशासनाकडून या सीमाभागात विकासकामे सुरु केली की तेलंगणाच्या अधिकाऱ्यांकडून मुद्दाम अडथळा आणला जातो. यामुळे पळसगुडा ग्रामस्थांत प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

गावकऱ्यांचे म्हणणे स्पष्ट आहे – “आमचे गाव महाराष्ट्रात आहे, महसुली नोंदीत नाव नोंदलेले आहे, मग तेलंगणाचा संबंधच कसा येतो?”

सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

सामाजिक कार्यकर्ते श्री. उत्तम भोगे, पळसगुडा यांनी संताप व्यक्त करत सांगितले –

“आमचे गाव महाराष्ट्राचे असून हे महसुली गाव आहे. तेलंगणाचा काहीही संबंध नाही. सातबाऱ्यातील शेतकरी स्वतःहून जागा दिली असूनही तेलंगणाचे अधिकारी जबरदस्तीने काम बंद करत आहेत. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष द्यावे.”

काय करणार महाराष्ट्र प्रशासन?

या घटनेनंतर मोठा प्रश्न उभा राहिला आहे –

➡️ महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकारी या प्रश्नावर काय भूमिका घेतील?

➡️ गावकऱ्यांचे काम थांबवणाऱ्या तेलंगणाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होईल का?

➡️ की पुन्हा सीमाभागातील गावकऱ्यांचे विकासकामे अडखळतच राहणार?

सीमेवरील गाव पळसगुडा यावेळी थेट महाराष्ट्र विरुद्ध तेलंगणा या वादाचा बळी ठरला आहे. गावकरी ठामपणे सांगत आहेत की – “आम्ही महाराष्ट्राचे आहोत, तेलंगणाची दादागिरी आम्हाला मान्य नाही!” आता प्रश्न असा की महाराष्ट्र शासन या प्रकरणावर कितपत ठाम पाऊल उचलते?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत