द बर्निंग ट्रेन, नंदूरबारमध्ये एक्सप्रेसला भीषण आग, प्रवासी हादरले; धावपळ आणि किंचाळ्यांमुळे एकच गोंधळ
द बर्निंग ट्रेन, नंदूरबारमध्ये एक्सप्रेसला भीषण आग, प्रवासी हादरले; धावपळ आणि किंचाळ्यांमुळे एकच गोंधळ
(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) नंदूरबार : नंदूरबारमध्ये गांधीधाम पुरी एक्सप्रेसला आग लागली आहे. नंदूरबार स्थानकात एक्सप्रेस पोहोचण्यापूर्वीच भीषण आग लागल्याने प्रवाशी प्रचंड हादरून गेले. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची एक्सप्रेसमध्ये एकच धावपळ उडाली. काही प्रवाशांनी तर घाबरून आरडाओरड सुरू केली. किंचाळ्या आणि गोंगाटामुळे एक्सप्रेसमध्ये एकच गोंधळ उडाला. आग लागल्यामुळे स्त्रिया आणि लहान मुले घाबरून गेली होती. भडकत जाणारी आग आणि त्यामुळे पसरलेल्या धुराच्या लोटामुळे काही प्रवाशांना तर श्वास घेण्यासही त्रास झाला. स्टेशन जवळ आल्याने एक्सप्रेसचा स्पीड कमी होता. त्यामुळे मोटरमनने प्रसंगावधान राखून एक्सप्रेस थांबवली. अग्निशमन दलाच्या जवानांनीही घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यास सुरुवात केली आहे. तसेच या एक्सप्रेसमधून प्रवाशांना तात्काळ बाहेर काढण्यात आले आहे. या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाही.
गांधीधाम पुरी एक्सप्रेस गाडी ला नंदुरबार स्थानकाजवळ अचानक आग लागली या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र रेल्वे स्टेशनच्या आत येण्याआधीच गाडीला अचानक आग लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळालं. आग विझवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे कुठलीही उपाययोजना नसल्याने आगीने रौद्ररूप धारण केल्याचं पाहायला मिळत आहे. तर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचं काम सुरू केलं आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल आहेत.
नेमकं काय घडलं?
आज सकाळी गांधीधाम पुरी एक्सप्रेस नंदूरबार स्थानकात येत असताना अचानक एक्सप्रेसच्या पॅन्ट्रीच्या डब्याला आग लागली. पॅन्ट्रीच्या डब्यात जेवण साहित्य, गॅस सिलिंडर आणि इतर साहित्य असते. त्या ठिकाणीच आगीने पेट घेतला. बघता बघता ही आग दुसऱ्या डब्यापर्यंत जाऊन पोहोचली. आगीने रौद्ररुप धारण केले. आगीबरोबर धुराचे लोळही पसरल्याने प्रवाशी हादरून गेले. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी प्रवाशांमध्ये एकच गोंधळ सुरू झाला. आगीची माहिती मिळताच मोटरमननेही गाडी थांबवली. त्यामुळे प्रवाशांनी गाडीत सामान टाकून तात्काळ गाडीतून धाड धाड उड्या मारत स्वत:ची सुटका करून घेतली.
म्हणून आग भडकली
यावेळी रेल्वेचे कर्मचारी, जवान आणि रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. मात्र, आग विझवण्यासाठी रेल्वेकडे कोणतीच साधनं नसल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होईपर्यंत रेल्वे कर्मचाऱ्यांना काहीच करता आले नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी येईपर्यंत आगीने प्रचंड रौद्ररुप धारण केलं. त्यामुळे दोन्ही डब्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नाही. सध्या आगीवर नियंत्रण आणलं जात आहे. तसेच त्यानंतर कुलिंग ऑपरेशन करण्यात येणार आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत