Breaking News

ना. नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी मातृशक्ती पुढे सरसावली

राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने व निषेध आंदोलन


महा घडामोडी न्यूज नेटवर्क चंद्रपूर : मागील काही महिन्यांपासून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप लागत आहे.बुधवारी असाच एक आरोप अल्पसंख्यांक मंत्री श्री नवाब मलिक यांच्यावर इ.डि ने चौकशीअंती लावून ना.मलिक यांना अटक केली आहे.तरी त्यांना मंत्रीपदावर कायम ठेवून सरकार पाठराखण करीत आहे.याचा निषेध नोंदविण्यासाठी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर तर्फे आज गुरुवार(24 फेब्रुवारी)ला जटपूरा गेट चंद्रपूर येथे निदर्शने व निषेध आंदोलन करण्यात आले.सरकारने ना.नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा भाजपा तीव्र आंदोलन छेडेल.असा इशारा चंद्रपूर भाजपा महानगरच्या मातृशक्तीने दिला.

विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष आ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात व डॉ मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वातील या आंदोलनात जि.प .अध्यक्ष संध्या गुरनुले,महापौर राखी कंचर्लावार,आत्मनिर्भर भारत जिल्हाध्यक्ष किरण बुटले,महिला मोर्चा अध्यक्ष अंजली घोटेकर,शीला चव्हाण,अल्का आत्राम, प्रभा गुडधे,रेणू घोडेस्वार, मंजुश्री कसंगोट्टूवार,प्रज्ञा बोरगमवार,माया मांदाळे,भारती दुधानी,पूनम गरडवा, लीलावती रविदास,माया उईके,शीतल आत्राम,पुष्पा उराडे,मोनिषा महातव,आदींची उपस्थिती होती.

डॉ गुलवाडे म्हणाले,ना.नवाब मलिक वरील आरोप गंभीर आहेत.इडिला एनआयएच्या ऑपरेशन्समध्ये एक मोठी लिंक मिळाली, ज्यातून रियल इस्टेटचे व्यवहार हे मनी लॉड्रींगच्या माध्यमातून होत आहेत, हे लक्षात आले.9 ठिकाणी सर्च केल्यानंतर काही बाबी पुढे आल्या. त्यातील एक प्रकरण हे मंत्री नवाब मलिक यांचे आहे.मंत्री नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डच्या माणसांकडून जमीन घेतली.ज्यांची मालकी आहे त्यांनी सांगितले की, त्यांना एकही पैसा मिळाला नाही.जेथे हसिना पारकर सौदा करीत होती, त्यांनी सुद्धा बयाण दिले आहेत. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून महाराष्ट्रातील मंत्र्याने व्यवहार करण्याचे कारण काय? असा प्रश्न डॉ गुलवाडे यांनी आंदोलनात बोलतांना उपस्थित केला.

जे लोक मुंबईत बॉम्बस्फोट करतात, अशांना या व्यवहारातून पैसे दिले जात असतील, ते अतिशय गंभीर आहे. कोट्यवधीच्या रकमेच्या या सौद्यातील 55 लाख रूपये हे हसिना पारकरला मिळाले.कुठल्याही राजकीय पक्षाने राजकारण न करता, अशाप्रकाराला थारा देण्याची गरज नाही. उलट या कारवाईचे सर्वांनी समर्थन करायला हवे.देशाच्या शत्रूशी व्यवहार करण्याचे कारण काय?याचे उत्तर ना मलिक यांनी दिले पाहिजे.असेही डॉ गुलवाडे म्हणाले.

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींचे बयाण ईडीने कारागृहात जाऊन घेतलेले आहे.देशाच्या शत्रूला मदत करणार्‍यांची गय केली जाऊ नये असे ते म्हणाले.यावेळी मातृशक्तीने ठाकरे सरकार विरोधात घोषणाबाजी करत ना.नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली.यावेळी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी समयोचित मार्गदर्शन केले.आंदोलनानंतर जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत