डॉक्टर व्हायचंय म्हणायची, अचानक टोकाचं पाऊल, 12 वी शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या आत्महत्येनं खळबळ!
डॉक्टर व्हायचंय म्हणायची, अचानक टोकाचं पाऊल, 12 वी शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या आत्महत्येनं खळबळ!
(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) औरंगाबादः ; बारावीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना औरंगाबादेत घडल्याने अस्वस्थता पसरली आहे. डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थिनीने असं अचानक आयुष्य संपवल्यामुळे कुटुंबावर आणि शहरावर शोककळा पसरली आहे. गुरुवारी 3 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तिने साडीच्या सहाय्याने घरातील फॅनच्या हुकला गळफास घेतला. दरम्यान, विद्यार्थिनीने आत्महत्या का केली, याचे गूढ अद्याप उकलले नाही. परीक्षेच्या ताणावापोटी तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
डॉक्टर व्हायचं होतं तिला…
या प्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, उषा कृष्णाचंद्र चौधरी असे या 18 वर्षीय विद्यार्थिनीचे नाव आहे. उषा ही देवानगरी परिसरातील एका कनिष्ठ महाविद्यालयात बारावीचा वर्गात शिक्षण घेत होती. तिचे वडील कृष्णाचंद्र हे फरशी बसवण्याचे काम करतात. तर आई घरकाम करते. तिला एक लहान भाऊ आहे. उषाला वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवायचा होता. त्यासाठी ती तयारीही करत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती तणावात होती.
काय घडलं त्या दिवशी?
कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी उषाचे वडील कामासाठी बाहेर गेले होते. सायंकाळी उषाचा लहान भाऊ बाहेर खेळत होता. तिने अभ्यासासाठी पेपर आणण्यास आईला दुकानात पाठवलं. आई बाहेर गेली आणि उषाने घरातील फॅनच्या हुकाला साडी बांधून गळफास घेतला. काही वेळाने आई घरी आली. तिने दार लोटून बघितले असता उषाने गळफास घेतला होता. यावेळी आरडाओरड केल्याने शेजारील नागरिकांच्या मदतीने तिला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून घाटी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला मृत घोषित केले. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत