नागपुरात शिंगाड्याचे शेव खाताच मळमळ, उलट्या, पोटदुखी! झाले असे की…
नागपुरात शिंगाड्याचे शेव खाताच मळमळ, उलट्या, पोटदुखी! झाले असे की…
महा घडामोडी न्यूज नेटवर्क कमलेश खोब्रागडे नागपूर : उपराजधानीत महाशिवरात्रीदरम्यान उपवासाचे खाद्यपदार्थ खाऊन सव्वाशेहून अधिक नागरिकांना विषबाधा झाली होती. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी शिंगाड्याचे शेव खाऊन दहा जणांना विषबाधा झाली. या सगळ्यांना नागपुरातील किंग्जवे रुग्णालयात दाखल केले गेले. तर अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
मिहान येथील ल्युपीन या फार्मा कंपनीतील दहा कर्मचाऱ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती आहे. विषबाधा झालेल्या तीन महिला व सात पुरुषांनी कंपनीतील उपाहारगृहात शिंगाड्याचे शेव सकाळी खाल्ले. त्यानंतर काही काळाने सगळ्यांना मळमळ, उलट्या, पोटदुखीचा त्रास सुरू झाला. काही थंडी वाजून कापायला लागले. तातडीने दहाही कर्मचाऱ्यांना कस्तुरचंद पार्कमधील किंग्जवे रुग्णालयात दाखल केले गेले. त्यापैकी काहींना खबरदारी म्हणून अतिदक्षता विभागात ठेवले गेले. परंतु, सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न शाखेचा दावा आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाला (एफडीए) विषबाधेची माहिती मिळताच तातडीने एक पथक रुग्णालय, दुसरे पथक मिहानमधील ल्युपीन कंपनीच्या उपाहारगृहात धडकले. तर या पथकांनी उपाहारगृहात कुठून पुरवठा झाला, त्याची माहिती मिळवत तेथेही भेट देत नमुने गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे आता एफडीए या प्रकरणात चौकशीतून काय पुढे आणणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून अशा घटनेमुळे शहरातील अन्नातून होणाऱ्या विषबाधेवर नियंत्रण मिळणार कसे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आठ ते दहा जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची तक्रार मिळाली. तातडीने एफडीएचे पथक रुग्ण दाखल असलेल्या किंग्जवे रुग्णालय, मिहानमधील कंपनीच्या उपाहारगृह, येथे वस्तू पुरवठा करणाऱ्या कंपनीकडे गेले आहे. एफडीएकडून वेळोवेळी अन्नाचे नमुने घेऊन दोषींवर कारवाई केली जाते.
महाशिवरात्रीदरम्यान विषबाधा प्रकरणात एफडीएने एकूण ९ अन्न पदार्थाचे नमुने गोळा करून विश्लेषणासाठी पाठवले. १ लाख ३२ हजार ९०० रुपये किंमतीचा साठा जप्त करत ८ आस्थापनांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली. उत्पादकांना संबंधित बॅचचा साठा बाजारातून परत बोलवण्याचे आणि पुढील आदेशापर्यंत व्यवसाय बंद करण्याचे लेखी आदेश दिले होते. तर एका कंपनीवर गुन्हाही दाखल केला गेला. परंतु, गुरुवारच्या घटनेमुळे पुन्हा बाजारात आणखी अनुचित पदार्थ असल्याचे संकेत मिळत असल्याने नागरिक एफडीएच्या कामावर प्रश्नचिन्हउपस्थित करत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत