Breaking News

राज्यात पुन्हा १० हजार शिक्षकांची भरती, कोणत्या महिन्यात होणार टीईटी? जाणून घ्या…

 राज्यात पुन्हा १० हजार शिक्षकांची भरती, कोणत्या महिन्यात होणार टीईटी? जाणून घ्या…

महा घडामोडी न्यूज नेटवर्क कमलेश खोब्रागडे नागपूर: नुकतीच राज्यात अकरा हजार शिक्षकांची भरतीची यादी जाहीर झाली आहे. अनेक जिल्ह्यात कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. यानंतर आता शिक्षक भरतीसाठी पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सरकारी व अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. तसेच दर वर्षी निवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे दरवर्षी रिक्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढत जात आहे. त्याचा विचार करून दरवर्षी शिक्षकांच्या जागा भरती करणे गरजेचे बनले आहे. मात्र पाच ते सहा वर्षांतून एकदा शिक्षक भरती केली जात आहे. त्यामुळे अनेक शाळांची मोठी अडचण होत असल्याने शिक्षण खात्याने दरवर्षी टीईटी घेऊन अधिक प्रमाणात शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात दहा हजार शिक्षकांच्या भरतीसाठी जून महिन्यात टीईटी होणार आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने टीईटीची तयारी करण्याची सूचना केली असून, परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. राज्यात रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी शिक्षण खात्याकडून २०१४ पासून टीईटी परीक्षा घेतली जात आहे. मात्र, टीईटी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या परीक्षार्थींचे प्रमाण अतिशय कमी असल्याने शिक्षक भरती करण्यास अडचण निर्माण होत आहे. तसेच टीईटी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींची सीईटी परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत पास होणाऱ्या परीक्षार्थींना गुणवत्तेनुसार शिक्षक भरतीसाठी प्राधान्य दिले जाते. मात्र सीईटी पास होणाऱ्या परीक्षार्थींची संख्या दोन ते तीन टक्के असते. त्यामुळे शिक्षण खात्याने अधिक प्रमाणात जागा भरण्याचा निर्णय घेतला तर सीईटी परीक्षेत गुणवत्ता मिळविले परिक्षार्थी कमी असतात त्यामुळे अधिक प्रमाणात जागा असूनही शिक्षक भरतीसाठी मंजूर झालेल्या जागा रिक्त राहत आहेत. त्यामुळे शिक्षण खात्याने १३५०० शिक्षकांच्या जागा भरतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जून महिन्यात पुन्हा टीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिक्षकांच्या सर्व जागा भरती करण्यास अडचण येणार नाही असे मत व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत