गडचांदूर शहर गुन्हेगारीच्या विळख्यात, पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर मोठं प्रश्नचिन्ह
गडचांदुर पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध धंद्याच्या बोलबाला
जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष देतील का?
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी हकानी शेख चंद्रपुर, गडचांदूर : चंद्रपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीत प्रचंड वाढ होत असून गडचांदूरसारख्या छोट्या शहरातही आता गुन्हेगारीचं साम्राज्य बळावत चाललं आहे. या गुन्हेगारीचं मुळं शोधायला गेल्यास, अनेकांचे बोट सरळसरळ अवैध धंद्यांकडे जाते, जे खुलेआम आणि जोमात सुरू आहेत. या सर्व अवैध धंद्यांना पोलीस यंत्रणेचा मूक पाठिंबा मिळत असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे.
अवैध धंद्यांचं शहर बनलं गडचांदूर
गडचांदूर शहर आणि परिसरामध्ये सट्टा, जुगार, अवैध दारू विक्री, कोंबडा बाजार, आणि ऑनलाइन सट्टा या गोष्टी खुलेआम चालू आहेत. हे सर्व धंदे इतक्या बिनधास्तपणे चालतात की जणू काय प्रशासनाची परवानगीच मिळाली आहे, असाच जनतेत समज निर्माण झाला आहे. सट्ट्यामुळे अनेक कुटुंबांची वाताहत झाली असून, अनेक युवक मानसिक, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या खचले आहेत.
सट्टा-पट्टीने युवा पिढीच्या आयुष्याची राख
शहरात सट्टा-पट्टीचं जाळं इतकं विळखा घालू लागलं आहे की अनेक युवक त्यात ओढले गेले आहेत. नोकरी-धंद्याचा अभाव, आणि लवकर पैसा मिळवण्याच्या हव्यासामुळे ते या धंद्यांकडे वळत आहेत. मात्र या मार्गाने मिळालेला पैसा टिकत नाही आणि परिणामतः ही तरुण पिढी कर्जबाजारी होत आहे. कर्ज फेडता न आल्याने अनेकजण गुन्हेगारीकडे वळत असून, चोऱ्या, लूटमार, दरोडे यांसारख्या गुन्ह्यांचं प्रमाण वाढू लागलं आहे.
अवैध दारू विक्रीमुळे समाज बिघडतोय
गडचांदूरमध्ये अवैध दारू विक्री हा जणू ‘उद्योग’ झाला आहे. दारूच्या नशेत अनेक तरुण आपलं भवितव्य अंधारात लोटत आहेत. त्यातून कौटुंबिक हिंसाचार, अपघात, आरोग्य समस्या, आणि आत्महत्या यांसारखे गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत.
कोंबडा बाजार आणि जुगारामुळे लाखोंचा व्यवहार, पण पोलिसांनी डोळेझाक
शहरात काही ठिकाणी दररोज लाखो रुपयांची कोंबड्यांची शर्यत लावली जाते. जुगाराच्या अड्ड्यांमध्ये दिवसभर गर्दी असते. हे अड्डे कुठे आहेत, हे सर्वसामान्य नागरिकांना माहिती असताना पोलीस प्रशासनाला कसे कळत नाही, हा मोठा प्रश्न आहे. की प्रशासन स्वतः याला संरक्षण पुरवत आहे?
ऑनलाइन सट्ट्याचं नवीन संकट
तंत्रज्ञानाच्या वापरातून आता सट्ट्याने नवीन रूप घेतलं आहे. मोबाईल अॅप्स आणि वेबसाईट्सच्या माध्यमातून लाखो रुपयांचे व्यवहार दररोज होत आहेत. पोलिसांना हे सर्व माहिती असूनही कुठलीही कारवाई होत नाही, यामुळे जनतेचा प्रशासनावरचा विश्वास उडत चालला आहे.
ट्राफिक पोलिसांची अवैधरित्या वसुली
अवघड परिस्थितीत आपलं कुटुंब चालवणाऱ्या सामान्य वाहनधारकांकडून ट्राफिक पोलीस दररोज "कारवाईची भीती" दाखवून वसुली करत असल्याचं बोललं जात आहे. हेल्मेट नसणं, गाडीचा कागदपत्रे अपूर्ण असणं यासारख्या कारणावरून वसुली केली जाते, मात्र मोठ्या गुन्ह्यांवर कारवाई नाही.
पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर संशय
हे सर्व अवैध धंदे इतक्या बिनधास्तपणे आणि खुलेआम कसे सुरू राहू शकतात? जनतेत असं म्हणणं आहे की काही पोलिस अधिकाऱ्यांना यामधून ‘हप्ते’ मिळत असल्याने तेच ह्या धंद्यांचं संरक्षण करत आहेत. काही सामाजिक कार्यकर्ते तर सरळ पोलीस विभागाकडेच आरोपाची बोट दाखवत आहेत.
जनतेची मागणी: जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हस्तक्षेप करावा
सध्या गडचांदूरमधील नागरिक प्रचंड अस्वस्थ आहेत. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे विनंती केली आहे की त्यांनी या शहरातील अवैध धंद्यांवर तात्काळ बंदी आणावी, आणि या मागे असलेल्या पोलिसांवर कारवाई करावी. अन्यथा जनतेचा संयम सुटेल आणि मोठ्या आंदोलनाला तोंड द्यावे लागेल.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत