पत्नी आणि मुलीची हत्या करुन गळफास घेत संपवलं आयुष्य
पत्नी आणि मुलीची हत्या करुन गळफास घेत संपवलं आयुष्य
महा घडामोडी न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीनं आपल्या पत्नी आणि 13 वर्षीय मुलीची गळा चिरुन हत्या केली आहे. पत्नी आणि मुलीची हत्या करुन आरोपी पतीनं स्वत: देखील गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. नागपुरातील हिंगणा एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या राजीव नगर येथे ही घटना घडली आहे. या दुहेरी हत्याकांड अन् आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण लागलं असून भोंदूगिरीचं नवीन कनेक्शन समोर आलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
विलास गवते असं पत्नी आणि मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. आरोपी विलास गवते यानं पत्नी अन् मुलीला रक्ताच्या थारोळ्यात पाडल्यानंतर स्वत: देखील आत्महत्या केली आहे. ही घटना नागपुरातील राजीव नगर तरोडा मोहल्ल्यात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत आरोपी विलास गवते याचं मानसिक संतुलन बिघडलं होतं. मागील काही काळापासून तो आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत होता. यामुळे त्याचं आपल्या पत्नीसोबत नेहमी भांडण होत होतं.
दरम्यान काल रात्री आरोपी विलास गवते हा काल रात्री पत्नी व मुलांसोबत झोपला होता. दरम्यान अचानक त्यानं पत्नी रंजना यांचा धारदार चाकुनं गळा चिरला. यावेळी गाढ झोपेत असलेली मुलगी अमृताला जाग आली. त्यामुळे त्यानं तिचीही गळा चिरून हत्या केली. मायलेकीच्या हत्येनंतर घाबरलेल्या आरोपीनं घराबाहेर जाऊन स्वत: देखील गळफास लावून आत्महत्या केली. हे हत्याकांड करण्याआधी आरोपीनं आपल्या 10 वर्षाच्या मुलाला दुसऱ्या खोलीत नेऊन ठेवलं होतं.
झोपेत असलेल्या दहा वर्षीय मुलाला मध्यरात्री जाग आली. तेव्हा बहीण आणि आईला रक्ताच्या थारोळ्यात पाहून तो घाबरला. त्यानं शेजारी राहणाऱ्या काकाला आईच्या तोंडातून रक्त येत असल्याचं सांगितलं. काकांनी घरी येऊन पाहिलं असता, संबंधित प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी आपल्या कुटुंबीयांच्या मदतीनं विलासचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा घराशेजारील एका झाडाला विलासनं देखील आत्महत्या केल्याचं दिसून आलं. यानंतर काकांनी हत्याकांडाची माहिती पोलिसांना दिली. आरोपी विलास गवते यानं हे टोकाचं पाऊल का उचललं याचा तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विलास याचा दुधाचा व्यवसाय होता. अलीकडच्या काळात त्याचं मानसिक संतुलन बिघडलं होतं. त्यामुळे त्याच्यावर डॉक्टरांकडून उपचार केले जात होते. पण प्रकृतीत काहीच सुधारणा होत नसल्यानं ते एका भोंदू बाबाकडून देखील उपचार घेऊ लागले होते. या हत्याकांडात भोंदूबाबाचा काही सहभाग आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत