सल्लामुल्ला खान याने ५६ मुलांना विकल्याचा बालहक्क संरक्षण आयोगाला संशय.
सल्लामुल्ला खान याने ५६ मुलांना विकल्याचा बालहक्क संरक्षण आयोगाला संशय.
सल्लामुल्ला खान हा बाळविक्री प्रकरणातील सूत्रधार आहे.
मुलांना विकणाऱ्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे - आयोग.
महा घडामोडी न्यूज नेटवर्क,नागपूर : बाळविक्री प्रकरणातील सूत्रधार सल्लामुल्ला खान याने ५६ मुलांना विकल्याचा संशय आहे. या मुलांना शोधण्यासाठी महिला व बालविकास विभागाचे पथक आणि पोलिसांची चमू सक्रिय झाली आहे. मुलांना विकणाऱ्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, मात्र विकलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांचे योग्य पुनर्वसन करण्याची महत्त्वाची जबाबदारी यंत्रणेवर असल्याचे मत राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशिबेन शाह यांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केले.
बाळविक्री प्रकरणातील सूत्रधार सल्लामुल्ला खान (वय ६२, रा. गिट्टीखदान) याने बाळाचे बनावट जन्मप्रमापत्र बनवून बाळाची विक्री केल्याचे पुढे आले होते. पोलिसांनी सल्लामुल्ला, दोन परिचारिका श्वेता, रंजना व बाळ विकत घेणारी महिला सरिताला अटक केली आहे. २०१९ मध्ये एका महिलेने त्याच्याकडून तीन लाख रुपयांमध्ये बाळ खरेदी केले.
हे प्रकरण उघडकीस येताच पोलिसांनी चौघांना अटक केली. त्याचे कोंढाळी येथे अनाथालय असून गिट्टीखदान भागात विधवा पुनर्वसन केंद्रही चालवितो. या घटनेची दखल घेत बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशिबेन शाह यांनी बुधवारी बैठक घेऊन सखोल चौकशीचे आदेश दिले. या प्रकरणात एकाहून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.
यंत्रणेतही दोष
मुलांना दत्तक घेताना गैरप्रकार होऊ नये म्हणून बालसंरक्षण अधिनियमानुसार पालकांना एका प्रक्रियेतून जावे लागते. बालसंरक्षण अधिनियम २०१५ च्या कलम ८०/८१ अंतर्गत मुलांना दत्तक घेण्याच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची तरतूद आहे. मुलांना दत्तक घेण्याचे नियमही ठरले आहेत. www.cara.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करून मुलांना दत्तक घेता येते.
या या प्रक्रियेला डावलून मुलांना दत्तक देण्यात आले. यंत्रणेची संपूर्ण माहिती असल्यानेच तो हे करू शकला. यंत्रणेतील काहींना हातीशी धरून हे प्रकार सुरू होते. दुर्गम भागातील मुले या जाळ्यात अडकवितात. असे प्रकार होऊ नये यासाठी विशेष पावले उचलण्यात येत असल्याचे शाह यांनी सांगितले.
बालसभा झाल्याच नाहीत
बालकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे यासाठी बालसभा घेण्याची तरतूद आहे. महिन्यातून एकदा अशा सभा होणे अपेक्षित आहे, मात्र त्या झाल्याच नसल्याची खंत शाह यांनी व्यक्त केली. वाढते बालविवाह लक्षात घेता टास्क फोर्स नेमण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.
बालविवाह रोखल्यानंतर लग्न मोडलेल्या त्या मुलीचे काय होते ? सामाजिक आघाताला तिला सामोरे जावे लागते. या मुलींचे समुपदेशन करून त्यांच्या पुनर्वसनासाठी सक्षम यंत्रणा उभी करण्याची गरजही शाह यांनी व्यक्त केली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत