राजुरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मँगो ज्यूस व फळ वितरण उपक्रम संपन्न.
राजुरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मँगो ज्यूस व फळ वितरण उपक्रम संपन्न.
राजुरा:- दि. १४ एप्रिल २०२६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई शाखा राजुरा यांच्या वतीने संविधान चौक, राजुरा येथे मँगो ज्यूस व फळ वितरणाचा सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पार पडला.
डॉ. आंबेडकरांच्या समता, बंधुता आणि न्यायाच्या विचारांचा प्रसार व्हावा तसेच समाजातील सर्व स्तरातील नागरिकांमध्ये एकात्मतेची भावना दृढ व्हावी या उदात्त हेतूने संविधान चौक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच संविधान चौक परिसरात नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. नागरिकांनी या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत आयोजकांचे कौतुक केले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष प्रा. महेश पानसे व जिल्हाध्यक्ष शंकर बोरघरे यांच्या मार्गदर्शनानुसार ज्यूस व फळ वितरणाचा उपक्रम पार पडला. डिजिटल मिडिया जिल्हाध्यक्ष अॅड. राहुल थोरात व राजुरा तालुका अध्यक्ष प्रा. अनंत डोंगे यांच्या नेतृत्वात संपूर्ण कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करण्यात आले होते. त्यांच्या नेतृत्वामुळे उपक्रम शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी डिजिटल मिडिया सचिव राकेश कलेगुरवार व संघाचे सहसचिव लोकेश पारखी यांनी विशेष परिश्रम घेतले. नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
उपक्रमात डिजिटल मिडिया राजुरा अध्यक्ष संतोष मेश्राम, संघाचे उपाध्यक्ष सतीश शिंदे, विजय जुलमे, संघटक कैलास कार्लेकर तसेच इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून नागरिकांना मँगो ज्यूस व फळांचे वाटप करत सामाजिक एकतेचा सुंदर संदेश दिला.
या प्रसंगी उपस्थितांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करून त्यांच्या कार्याचे स्मरण केले. समाजात समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांची जपणूक करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. अशा उपक्रमांमुळे सामाजिक ऐक्य वाढीस लागून समाजात सकारात्मक परिवर्तन घडण्यास हातभार लागतो असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
एकंदरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित हा उपक्रम केवळ सेवा कार्य न राहता सामाजिक जागृतीचा संदेश देणारा ठरला.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत