डिजिटल इंडियाचा शिलेदार चार महिन्यापासून उपाशी
डिजिटल इंडियाचा शिलेदार चार महिन्यापासून उपाशी
संगणक परिचालकांचे बेमुद काम बंद आंदोलन
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, शेख हक्कानी, जिवती : चंद्रपूर जिल्ह्यातील ग्राम पंचायत अंतर्गत संगणक परिचालक या पदावर कार्यरत असणाऱ्या संगणक परिचालकांचे मागील चार महिन्यांचे थकित मानधन मिळाले नसल्याने आज जिल्हातील संगणक परिचालक यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. मागील १२ वर्षापासून संगणक परिचालक ग्राम पंचायत कार्यालयात प्रामाणिक पणे आपली सर्व ऑनलाईन तथा ऑफलाईन कामे नागरीकांना देण्यात येणाऱ्या सर्व सेवा नियमितपणे
जबाबदारीने पूर्ण करीत आहेत. त्यांना कामाचा मोबदला मानधन स्वरुपात मिळत असून सुध्दा ०४ ते ०५ महिने मानधनाची संगणक परिचालकांना वाट बघावी लागते. याचा संगणक परिचालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो व याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.डिजीटल महाराष्ट्र व डिजीटल इंडिया करण्याच्या हेतूने केंद्र सरकार तसेच राज्य सरकार प्रयत्नशिल असून त्याचे मुख्य दुवा म्हणून संगणक परिचालक ग्रामीण पातळीवर आपले कामकाज जबाबदारीने पूर्ण करीत असून सुध्दा यांच्या समस्यांकडे शासन तथा प्रशासन यांचे डोळेझाक बघायला मिळत आहे.
संगणक परिचालक यांचे वरिष्ठ तथा सरपंच यांचेकडून बऱ्याच कामाचा भडीमार नेहमी होत असतो परंतु थकित मानधनाबाबत जिल्ह्यातील वरीष्ठ अधिकारी व तालुका वरिष्ठ अधिकारी यांना विचारले असता पि.एफ.एम.एस. व आर.टी.जी.एस. झाले नाही या मुद्यावर बोलून उडवाउडवीची उत्तरे नेहमीच दिली जातात. परंतु पिएफएमएस व आरटीजीएस करून घेणे संगणक परिचालक यांच्या अधिकार क्षेत्रात येत नसून सुध्दा संगणक परिचालक यांनी ते करून घ्याव असा तगादा वरीष्ठ अधिकारी यांच्याकडून केला जातो.अशी माहिती दिपक साबने, अध्यक्ष, संगणक परिचालक संघटना जिवती यांनी दिली.
थकीत मानधनाबाबत दिड महिन्याआधी जिल्हा प्रशासन व सीएससी कंपनी यांना निवेदन देण्यात आले तरीसुध्दा त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही अद्यापही मानधन थकीत स्वरुपात आहे. ०४ महिन्याचे थकीत मानधन न झाल्याने संगणक परिचालकांचे कुटुंब खूप वाईट परिस्थितीतून जिवन जगत आहे. थकित मानधन समस्येमुळे जर कोणत्याही संगणक परिचालकाने त्रासून जीवास हानी पोहचविल्यास याचे सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील असा इशारा दिपक साबने,
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना, जिवती यांनी गटविकास अधिकारी, जिवती यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. व जोपर्यंत थकित चार महिन्याचे मानधन एकत्रितपणे होणार नाही तो पर्यंत कडकडीत बेमुदत कामबंद करण्यात येणार असल्याचेही निवेदनात नमूद आहे. यावेळी निवेदन देताना दिपक साबने, अध्यक्ष, सय्यद सलाम,सचिव, विजय गोतावळे, नागनाथ आक्रपे, सदाशिव राजपंगे,सोमु सिडाम, राहुल कांबळे, बळीराम काळे, विलास वाघमारे यासह तालुक्यातील सर्व संगणक परिचालक उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत