भारी पोलीस स्टेशन बनले 'वसुलीचा अड्डा'? जिवती तालुक्यात चर्चेला उधाण
अवैध युरिया खत व बैल वाहतुकीच्या प्रकरणात कारवाईऐवजी पैशांची वसुली होत असल्याचा आरोप; निष्पक्ष चौकशीची मागणी
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : जिवती तालुक्यातील भारी पोलीस स्टेशनच्या कार्यपद्धतीबाबत सध्या विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे. अवैधरित्या युरिया खत तसेच बैलांची वाहतूक करणाऱ्यांकडून पैशांची वसुली केली जाते आणि त्यानंतर संबंधितांवर कोणतीही कायदेशीर कारवाई न करता त्यांना सोडून दिले जाते, असे आरोप परिसरातील काही नागरिकांकडून केले जात आहेत.
या आरोपांमुळे परिसरात विविध चर्चा रंगल्या असून, या प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सखोल आणि निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. जर या आरोपांमध्ये तथ्य आढळले, तर संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची सत्यता चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. नागरिकांचे म्हणणे ऐकून पारदर्शक तपास करण्यात आल्यास जनतेचा पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होईल, असे मत व्यक्त केले जात आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत